नेपाळ – काठमांडू येथील तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन….

0
149

नेपाळ, दि. २० (पीसीबी) – तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन काठमांडू येथे नुकतेच दिमाखात संपन्न झाले. उदघाटनाच्या दिवशी सकाळी ठीक साडेआठ वाजता काठमांडू येथील सबरिना हॉटेलच्या परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष बकुळग्रंथकार कवी राजन लाखे, मुख्य अतिथी मा. शिक्षण सहसंचालक एम.के.गोंधळी एस.एस.सी. बोर्डाचे माजी सचिव अनिल गुंजाळ, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली संस्थेच्या अध्यक्षा कल्पना गवरे, उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर आगरकर, अमेरिका (फिलाडेल्फिया) वरून आलेले डॉ. कलिंद बक्षी, डॉ. किन्नरी कलिंद बक्षी हे दांपत्य तसेच गोवा, पुणे ठाणे, मुंबई, अकलूज, सातारा येथून आलेले अनेक साहित्यिक व रसिक सहभागी झाले होते.

या ग्रंथ दिंडीत ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गुरू चरित्र अशा धार्मिक ग्रंथांव्यतिरीक्त दिंडीचे खास आकर्षण म्हणजे दिंडीत पशू पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन संबंधित विविध पपेटस् बाहुल्यां व मुखवटे हातात घेऊन शिक्षण व पर्यावरण संवर्धन संबंधित विचाराचा प्रचार व प्रसार करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी मुख्य मंडपात आली. संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ.शोभा धामस्कर यांच्या कथ्थक नृत्याने तसेच वाडेकर यांनी गायिलेल्या ईशस्तवनाने साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली.

सुरवातीला “कल्पनेचा फुलोरा”, “टण टणा टण”, “मन की बाते”, “जाणिवांची आवर्तने” हसत खेळत गणित, या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख अतिथी एम. के. गोंधळी यांचे “मराठी भाषेची अस्मिता जागवताना” या विषयावर व्याख्यान झाले. सन्मेलनाध्यक्ष राजन लाखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत मराठी भाषा अभिजात असुनही अजुनपर्यंत त्यावर सरकारचा शिक्कामोर्तब नसल्याने खंत व्यक्त केली आणि मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली.

दुस-या सत्रात “मराठी भाषेवर होणारे प्रसार माध्यमाचे परिणाम” या विषयावर अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये डॉ. रासगे, प्रा. मकाशीर, रविंद्र सोनवणे , नंदकुमार पवार यांनी सहभाग घेतला. तिस-या सत्रात अनिल गुंजाळ यांनी राजन लाखे यांची ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्यावर लिहिलेल्या “बकुळगंध” या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल “बकुळगंध फुलतांना” या शीर्षकाखाली मुलाखत घेतली. चौथ्या सत्रात “कथासुगंध” या कार्यक्रमात सुधाकर आगरकर, किरण लाखे, व एम. के. गोंधळी यांनी कथा सादर केल्या. पाचव्या सत्रात गझलकार बबन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. संमेलनात सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशातील साहित्यिकांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ येथे भारतीय दूतावासातील डॉ. आसावरी बापट यांनी संमेलनास उपस्थित होत्या. डॉ. उषा पवार यांनी सुत्रसंचालन केले. देश विदेशात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट साध्य करत अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलनाचा मराठी झेंडा नेपाळ येथे फडकला हे विशेष!