निवडणुकीच्या फंडासाठी राज्यात प्लॅस्टिकबंदी – राज ठाकरेंचा आरोप

0
789

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लॅस्टिकबंदी केली गेली नाही ना, अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. काही काळानंतर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय केराच्या टोपलीत जाऊन सर्व काही पूर्ववत होईल, असा दावाही राज यांनी केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामे नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले. प्लॅस्टिकबंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी केला. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावे, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावले.

काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी केलेल्या विरोधाची किनार या वक्तव्याला होती.