नियम फक्त सामान्यांनाच का? कोरोना नियम वेशीवर टांगत आमदाराच्या दोन्ही मुलांचं धूमधडाक्यात लग्न; बड्या नेत्यांची लग्नाला हजेरी

0
528

सोलापूर, दि.२८ (पीसीबी) : गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाने आजपर्यंत भारतात तग धरला आहे. पहिल्या लाटेनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली. आता कोरोनाची तिसरी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोरोनाची लाट ओसरायला मदत होईल म्हणून कडक नियमांचा त्रास होत असताना सुद्धा, लोक सहन करत आहेत. तर इकडे सोलापूर जिल्ह्यात देखील संध्याकाळी चारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन असतो. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीच हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांना फाट्यावर बसवत जिल्ह्यातल्या बार्शी येथील आमदारांनी आपल्या मुलांचा जंगी विवाह सोहळा पार पाडला.

बार्शी विधानसभेचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचे लग्न रविवारी बार्शीत मोठ्या धडाक्यात पार पडले. आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीचे चेअरमनही आहेत. त्यांची दोन मुलं रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी 6.45 मि. मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी हजरोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता. विशेष म्हणजे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते.

भाजप आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारीदेखील या लग्नाला उपस्थित होते.

एकीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्यासारखे नेते पूरग्रस्त भागात जाऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र लग्न सोहळ्यात उपस्थिती लावत आहेत. या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांची अक्षरश: पायमल्ली होत आहे.

दरम्यान सर्वसामान्य लोकांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या बार्शी पोलिसांनी, हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या या सोहळ्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसात गन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. योगेश मारुती पवार या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. योगेश पवार यांनी या लग्न सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी बार्शी पोलिसात अर्ज केलेला होता. केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्यास हरकत नसल्याची लेखी समज पोलिसांनी योगेश पवार यांना दिली होती. मात्र प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने लोक या लग्न सोहळ्यास हजर राहिल्याने पोलिसांनी केवळ योगेश पवार यांच्याच विरोधात आयोजक म्हणून गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का असा प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातोय.