नागपुरात नागरिकांनी केली गुंडाची हत्या

0
467

नागपुर, दि. १३ (पीसीबी) – गुंडाच्या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी मिळून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना शांतीनगर परिसरातील नालंदा चौकात घडली.

आशिष देशपांडे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष देशपांडे नेहमी वस्तीतील लोकांना त्रास द्यायचा. गल्लीमधील अरुंद ठिकाणीही तो बेदरकारपणे दुचाकी चालवायचा. सोमवारी रात्री ममता ढोक नावाच्या महिलेने त्याला जाब विचारला असता, त्याने शिवागीळ करत हल्ला केला. ममता ढोक यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याने आशिष तेथून निघून गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास आशिष पुन्हा एकदा तिथे आला आणि अश्लिल भाषा वापरत शिवीगाळ करु लागला. यावेळी त्याच्या हातात चाकू होता. आशिष परिसरातील सर्वांनाच धमकावत असल्या कारणाने वस्तीमधील तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड, विटा, चाकूचा वापर करत आशिषवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आशिषचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून काहीजण फरार आहेत.