धक्कादायक: बीड जिल्ह्यात चोवीस तासात चार शेतकऱ्यांची आत्महत्या

0
820

बीड, दि. १५ (पीसीबी) – चोवीस तासात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.

पहिली घटनेत राजेवाडी (ता. माजलगाव) येथील गणेश गंगाधर घुबडे (वय २६) यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना अवघी दीड एकर कोरडवाहू जमीन असून नापिकी व कर्जबाजारीपणाने ते आर्थिक विवंचनेत होते.

दुसरी घटना मैंदा (ता. बीड) येथे घडली. केशव दादाराव मोमीन (वय ५८) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वत:च्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना ३ एकर जमीन आहे. त्यांच्याकडे बीडच्या युनियन बँकेचे ८० हजारांचे कर्ज होते. दुष्काळामुळे पीक वाया गेले. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

तिसऱ्या घटनेत सुशी (ता. गेवराई) येथील बाबासाहेब भगवानराव भांडवलकर (वय ६५) यांनी रविवारी दुपारी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. तर चौथी घटना केज शहरात घडली. बँकेतून पीक कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाची परतफेड कशी करायची? या विवंचनेतून केज शहरातील बाबूराव शंकर गुंड या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.