धक्कादायक: प्रेम विवाह केल्याने मुलीच्या आई-वडिलांनी केला मुलाच्या आईचा दगडाने ठेचून खून तर घरघुती वादातून मुलाने केली पत्नीची हत्या

0
746

परभणी, दि. १३ (पीसीबी) – आपल्या मुलीसोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आईचा  दोन वर्षांपूर्वी दगडाने ठेचून खून केला. यानंतर घरघुती कारणावरुन संबंधीत मुलाने स्वत:च्या पत्नीचा गळ दाबून खून केला आणि पसार झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१२) परभणी शहरातील पंचशीलनगर येथे घडली.

मयुरी वाकळे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या आई-वडीलांना पतीच्या आईचा खून केल्या प्रकरणात न्यायालयाने कोठडी सुनावली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील पंचशीलनगर येथील अनंत खंदारे आणि शेजारीच राहणाऱ्या मयुरी वाकळे या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. लग्नाच्या सहा महिन्यातच मयुरीची आई आणि वडील चंद्रकांत वाकळे यांनी अनंत खंदारे या त्यांच्या जावयाची आई गयाबाई खंदारे यांचा “तुझ्या मुलाने माझ्या मुलीसोबत लग्न का केले?” असा सवाल करत दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी मयुरीची आई आणि वडील चंद्रकांत वाकळे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी मयुरीच्या आईचा जामीन झाला परंतु अद्याप वडील कारागृहातच आहेत. मंगळवारी रात्री मयुरी आणि अनंत यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अनंतने मयुरीचा गळा दाबून खून केला आणि पसार झाला. या घटनेने परभणीत खळबळ उडाली आहे. नेमका अनंतने आईच्या खुनाचा बदला घेतला की या खुनामागे अजून कोणते कारण आहे? याचा पोलीस तपास करत आहेत.