“देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, अनुभवाचा भाजपाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला”

0
165

पाटणा,दि.१०(पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असं वक्तव्य बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केलं आहे.

“बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसंच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर फडणवीसांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असं संजय टायगर म्हणाले.

दरम्यान भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. अधिकृतरित्या नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असा दावा फडणवीस यांनी केला होता.