दिल्लीत पाकिस्तानचे दोन गुप्तहेर पकडले

0
288

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला मदत करणाऱ्या दोन गुप्तहेरांना राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयात काम करत माहिती जमा करण्याचं काम या दोन हेरगिरांकडून केलं जात होतं. रविवारी दोघांना कागदपत्रांची देवाणघेवाण करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. आयएसआयचे गुप्तहेर स्वतःला उद्योजक सांगून सैन्य अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायचे. न्यूज रिपोर्टर्ससाठी माहिती जमा करत असल्याचं सांगितलं जायचं. माहिती मिळताच ती आयएसआयला दिली जायची. काश्मीरपासून ते सैन्यापर्यंतची गुप्त माहिती जमा करण्याचं काम पाकिस्तानकडून केलं जात होतं.

गुप्तहेरांना आयएसआयकडून पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं होतं. आबिद हुसैन (४२) आणि ताहिर खान (४४) हे बनावट आधार कार्ड घेऊन भारतात मुक्त संचार करत होते. सैन्य अधिकाऱ्यांसोबत वारंवार भेटी घेतल्या जायच्या आणि माहिती काढण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यामुळेच हे दोन मिलिट्री इंटिलिजेन्सच्या रडारवर आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मदतीने या दोघांवर नजर ठेवण्यात आली. तीन पाकिस्तानी नागरिक रविवारी अत्यंत संवेदनशील माहितीसाठी एका सैन्य अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून १५ हजार रुपयांसह दोन आयफोन जप्त करण्यात आले.

पेटीएमने व्हायचं पेमेंट

पाकिस्तान उच्चायुक्तालयातील व्यापार विभागात सहाय्यक म्हणून काम करणारा आबिद हुसैन आयएसआयचा हस्तक होता. आयएनएसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील आहे. आपण अमृतसरमधील असल्याचं त्यांनी भारतात सांगितलं. त्याचा साथीदार मोहम्मद ताहिर इस्लामाबादचा असून उच्चायुक्तालयात वरिष्ठ क्लर्क आहे. दोघेही दोन वर्षांपासून उच्चायुक्तालयात काम करत आहेत. त्यांचं वाहन चालवणारा जावेद देखील पाकिस्तानच्या पंजाबमधील राहणारा आहे. हे सर्व सोबतच ‘न्यूज रिपोर्टर्स’साठी माहिती जमा करायला निघायचे. न्यूज रिपोर्टर्स हे डमी रिपोर्टर्स होते, ज्यांना प्रत्येक लेखासाठी २५ हजार रुपये आणि महागड्या भेटवस्तू, पेटीएमने पैसे दिले जायचे.

पाकिस्तानला फुटला घाम

गुप्तहेर पकडल्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप खोटा असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांना टॉर्चर केलं जात असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला. भारताने या तीन जणांना पकडून काश्मीर मुद्द्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील बिघडलेली परिस्थिती, मानवाधिकारांचं उल्लंघन आणि भाजप सरकारसमोर उभी राहिलेली अंतर्गत आणि बाह्य आव्हाने यावरील लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

२४ तासात देश सोडण्याचा आदेश
या गुप्तहेरांविरोधात अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित केलं आहे. त्यांना २४ तासात देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारची अखेरची घटना २०१६ मध्ये घडली होती, जेव्हा पाकिस्तानच्या डिप्लोमॅटिक कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलं होतं. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कोणताही कर्मचारी भारतविरोधी घडामोडींमध्ये सहभागी नसावा, याची निश्चिती करा, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. या हेरगिरांनी काय माहिती दिली याचा तपास केला जात आहे. आता उच्चायुक्तालयातील इतर कर्मचाऱ्यांवरही निगराणी ठेवली जाणार आहे.