दक्षिणेतून भाजपसाठी गुड न्यूज

0
143

लोकसभा निवडणूक 2024 चा बिगूल वाजला आहे. लोकसभा निवडणुकीत हॅटट्रीक करण्याचा चंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधला आहे. तर विरोधकांनी त्यांना जेरीस आणण्यासाठी मतभेद विसरत INDIA आघाडीच्या माध्यमातून शड्डू ठोकले आहे. त्यामुळे हा सामना एकतर्फी रंगणार की विरोधक सुरुंग लावण्यात यशस्वी होणार हे ही हातघाईची लढाई संपल्यावर लागलीच समोर येईल. जून महिन्यात देशाचा कौल कुणाला हे चित्र स्पष्ट होईल. जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते, हे समोर येईल. या निवडणुकीत कुणाचे सरकार येईल, यावर गावातील पारापासून ते दिल्लीपर्यंत चर्चा झडत आहे. प्रत्येक जण अंदाज वर्तवत आहे. निडणूक रणनीतीकार, विश्लेषक प्रशांत किशोर यांचा अंदाज काय, चला तर जाणून घेऊयात..

प्रशांत किशोर यांनी उत्तरेतील अनेक राज्यात केलेले अंदाज बेमालूमपणे खरे ठरले. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे राजकीय पक्ष लक्ष देतात हे वेगळं सांगायला नको. त्यांच्यामते लोकसभेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षा पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूत अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी दाखवणार आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या जागा वाढतील. पण तरीही एकहाती सत्ता आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार असल्याचा दावा किशोर यांनी केला आहे. पीएम मोदी यांनी एनडीए लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा खिशात घालेल. त्यात एकटी भाजप 370 जागा जिंकेल असा दावा केला होता. पण किशोर यांच्या मते 370 जागा निवडून येणे अवघड आहे.

प्रशांत किशोर यांच्या मते, बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि केरळात भाजपच्य जागा वाढतील. त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. भाजपच्या किती जागा येतील हा आकडा सांगितला नाही. गेल्या निवडणुकीत या राज्यात भाजपला मोठी कामगिरी बजावता आली नाही. उत्तर भारतातून भाजपसाठी सत्तेचा राजमार्ग विस्तारला होता. पश्चिम बंगालविषयी देशभरात मोठी उत्सुकता आहे. ममता बॅनर्जी यांच्या खेला होबे रे ने गेल्यावेळी भाजपला धूळ चारली होती. पण आता हवेचा रोख बदलण्याचे संकेत किशोर यांनी दिले. तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजप जोरदार कामगिरी बजावणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. 2024 मध्ये टीएमसीपेक्षा भाजपला अधिक जागा मिळण्याचा त्यांचा अंदाज अनेकांसाठी धक्कादायक आहे.

प्रशांत किशोर यांच्या मते, आगामी निवडणुकीत दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यात भाजपच्या जागा वाढतील. ज्या भागातून राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी जमीन कसली, त्याच भागात भाजप कमळ फुलवणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मोदी यांच्या लोकप्रियतेचा हा परिणाम असल्याचे किशोर यांचे म्हणणे आहे. विरोधकातील समन्वय, एकजुटतेचा अभाव आणि त्यांच्या चुका मोदींच्या पथ्यावर पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. ‘मी कोणतीही भविष्यवाणी करु इच्छित नाही, पण पश्चिम बंगालमध्ये भाजप धक्कातंत्र देण्यात यशस्वी होईल. तर दक्षिणेतूनही भाजपसाठी आनंदवार्ता येईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.