सातारा, दि. ३ (पीसीबी) – गणेशोत्सवात तरुणाईचा उत्साह वाढवायचा असेल, तर डॉल्बी गरजेचा आहे. काही लोक डॉल्बीमुळे इमारती पडल्याचे सांगतात, असे असते, तर सर्जिकल स्ट्राईकसाठी विमानांऐवजी डॉल्बीच वाजवले असते, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी लगावला आहे.
यंदा गणेशोत्सवात डॉल्बीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. गणेश भक्तांकडून डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. तर प्रशासन मात्र बंदीवर कायम आहे. यावर उदयनराजे यांनी जाहीरपणे डॉल्बी लावण्याचे समर्थन केले आहे.
दरम्यान, मागील वर्षी याच मुद्यावरून उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे –पाटील यांच्यामध्ये फैरी झडल्या होत्या. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा समाचार घेताना कोणी मला खो देण्याचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.