“…तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील”; शिवसेना नेत्याने दिला मोदी सरकारला इशारा

0
250

– आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : “आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. सगळी चौकशी झाल्यानंतर १०० नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना पुढे असंही म्हणाले कि, “प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,”

प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धड टाकल्यानंतर यावर फडणवीसांनी सरनाईकांनी काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असं म्हटलं होत, यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, “कोणी चौकशीला घाबरत नाही. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे विसरु नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे लवकरच कळेल”. असं म्हणत त्यांनी भाजपाला इशाराच दिला आहे.