गोंदीया, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेसच्या पुढाकाराने होत असलेली महाआघाडी देशपातळीवर नव्हे, तर राज्यपातळीवर व्हायला हवी. जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे, त्याने मोठ्या भावाची भूमिका घ्यावी. इतर पक्षांनी त्याला सहकार्य करावे. नाही तर आघाडी टिकणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे दिला.
गोंदिया येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. दरम्यान, गोंदिया जिल्ह्य़ातील डव्वा येथे रिलायन्स समूहाने बांधलेल्या कॅन्सर डे केअर सेंटरचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पवार म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील ४० जागांबाबत चर्चा झाली आहे. इतर आठ जागांसंदर्भात दोन्ही पक्षांच्या दिल्ली येथील बैठकीत मोठय़ा नेत्यांच्या उपस्थितीत निर्णय होणार आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असून मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे गंभीर दुष्काळाच्या कचाटय़ात सापडल्याचे दिसून आले आहे, असे ते म्हणाले.