जनता लयं अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील

0
165

पिंपरी चिंचवड शहराच्या अर्थकारणाला शरद पवारांमुळे चालना कार्यकर्ता मेळाव्यात अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम करत पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्यामध्ये शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनता लय अवघड आहे; लोक विचार करून मतदान करतात. येत्या निवडणुकीत जनता महायुतीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (२ डिसेंबर) करण्यात आले. तसेच यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी माजी आमदार आणि राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त झालेले ॲड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर सुमनताई पवळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मीना नानेकर, शकुंतला भाट, स्मिता कुलकर्णी, मधुकर चिंचवडे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, ज्येष्ठ नेते श्याम वाल्हेकर, प्रकाश म्हस्के, निहाल पानसरे, ज्योती निंबाळकर, इम्रान शेख, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, शिरीष जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचे समाजकारण म्हणजे बहुजन समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणे आणि हेच कार्य राजकीय सामाजिक भावनेतून शरद पवार करत आहेत. जे सोडून गेले त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. परंतु जनतेबरोबर राहिले तर सत्ता सत्ता येते. शरद पवारांनी दहा वेळा अशी किमया करून दाखवलेली आहे. राज्याची विस्कटलेली घडी पवार साहेबच पुर्ववत करू शकतात, असा विश्वास जनतेला आहे. म्हणूनच जनता शरद पवारांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच निवडणुका होत असून नवा डाव सुरू होत आहे. कारण पूर्वीच्यांची मुदत आता संपलेली आहे. येत्या काळात महापालिका तसेच राज्यात राष्ट्रवादीची पर्यायाने महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञाननगरी आणत शहराच्या अर्थकारणाला शरद पवार यांनी चालना दिली. सत्ताधाऱ्यांनो नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. इंद्रायणीमाईवर फेसाचा तवंग येत आहे, असे प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केले. वारकऱ्यांना कशाला नमन करायचे. भौतिक सुखाची नाही तर आपल्याला तत्वांची लढाई लढाईची आहे, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक करताना तुषार कामठे म्हणाले की,पिंपरीत नवीन सुरू झालेल्या पक्ष कार्यालय मध्ये ई सुविधा केंद्रद्वारे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मदत केली जाईल. येथे महिला व युवतींसाठी स्वतंत्र कक्ष असून याद्यावत कार्यालयात भविष्यात नागरिकांना कोणते कामानिमित्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे आज पवार साहेबांबरोबर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास तुषार कामठे यांनी व्यक्त केला. आभार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी मानले. यावेळी ॲड. जयदेव गायकवाड, प्रशांत जगताप, महेबुब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.