घुसखोरांवर कारवाई करण्याची हिंमत आम्ही दाखवली – अमित शहा  

0
384

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या घोषणा काँग्रेसने भरपूर केल्या. मात्र, कारवाईची हिंमत त्यांच्यात नव्हती ही हिंमत आम्ही दाखवली, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत दिले. यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला.  

नॅशनल रजिस्ट्रर ऑफ सिटीझन मध्ये ४० लाख लोकांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही. यावरून राज्यसभेत चांगलेच वादंग माजले. सरकारच्या नोंदींमध्ये कमतरता आहेत. केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी या नोंदी करण्यात आल्या आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.

यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेल्या आसाम अॅकॉर्ड करारात या रजिस्टरचा आत्मा आहे. पण आजवर काँग्रेसच्या कार्यकाळात एकदाही एनआरसीमधून घुसखोरांचे नाव वगळलेले नव्हते. तसेच काँग्रेसने या यादीला विरोध करून घुसखोरांना पाठिशी घालू नये, असेही अमित शहा म्हणाले .