‘गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं….’; शिवसेना आमदारच पडळकरांना सणसणीत उत्तर

0
336

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार मनिषा कायंदे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. ‘गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत’, अशी बोचरी टीका मनिषा कायंदे यांनी पडळकरांवरती केलीये.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असा टोलाही पडळकरांनी लगावलाय. ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आव्हानावरुन टोला लगावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.