राळेगणसिद्धी, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार हे आतापर्यंतचे सर्वात खोटारडे सरकार आहे. अशा निर्दयी सरकारसाठी अण्णांनी जीवाची बाजी लावू नये. जीव धोक्यात घालू नये. उपोषण सोडावे,’ असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) अण्णांना दिला आहे.
राळेगणसिद्धीत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांशी चर्चाही केली. त्यानंतर राज म्हणाले की, अण्णांच्या आंदोलनामुळेच नरेंद्र मोदींसह अनेक जण आज सत्तेत आहेत. पण सत्ता आल्यानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. भाजपच काय, काँग्रेस-राष्ट्रवादी सगळेच ढोंगी आहेत. माणसं वापरणं आणि फेकून देणे हेच यांना माहीत आहे.
अण्णा जगले काय आणि मेले काय यांना काहीच फरक पडत नाही. असल्या निर्लज्ज लोकांसाठी अण्णांनी जिवावर बेतेल, असे काही करू नये. उपोषण सोडून ही राजवट गाडून टाकण्यासाठी काय करता येईल ते करावे, असे राज यावेळी म्हणाले.