नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – भारतात यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नसली, तरी अधिक पाऊस होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही, असा प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने आज (सोमवार) वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
‘स्कायमेट’ने नैऋत्य मोसमी पावसाविषयीच्या प्राथमिक अंदाजात यंदाच्या मान्सूनच्या पावसावर एल-निनोचा अधिक प्रभाव जाणवेल, असे म्हटले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत एल-निनोचा प्रभाव होता. मात्र, त्यानंतर हा प्रभाव कमी होताना दिसत आहे. यामुळे यंदा मान्सूनचे प्रमाण ५० टक्क्यांच्या अधिक राहण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.
जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये जुलै-सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या अखेरीस पावसाची सरासरी ९१ टक्के होती. हवामान विभागाच्या ९७ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत ही कमी होती.