‘कुणी तरी कुणाला चिरडलं म्हणजे इतरांनाही चिरडण्याचा अधिकार मिळतो असं नाही’

0
166

मुंबई, दि.११ (पीसीबी) : लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलाला काय शिक्षा झाली पाहिजे? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच रोखठोक उत्तर दिलं आहे. शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला नाही. न्यायालय या संदर्भात कारवाई करेलच. पण कुणी तरी कुणाला चिरडलं म्हणजे इतरांनाही चिरडण्याचा अधिकार मिळतो असं नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदवरून आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांना लखीमपूर हिंसेतील आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. या करिता शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा नाही. तो न्यायालयाचा अधिकार आहे. न्यायालय त्या संदर्भात योग्य ती शिक्षा देईल. त्यामुळे कुणी तरी गाडीखाली चिरडलं म्हणजे इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढं निंदणीय असेल तेवढंच त्याला समोर ठेवून असं काम करणंही निंदणीय असेल, असं फडणवीस म्हणाले.

लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्यावर कारवाई करत आहे. आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्यासाठी नाही, पण राजकीय पोळी भाजता येईल का, या संकुचित विचाराने केलेला हा बंद आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही, पण प्रशासनाची दमदाटी, पोलिसांची दमदाटी करुन, जीएसटी, यांचा वापर करुन बंद केला जात आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.

तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं ते म्हणाले.