काश्मीर आतंकवाद मुक्त करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करा ! – श्री. राहुल कौल, यूथ फॉर पनून काश्मीर

0
228

पुणे, दि.१७(पीसीबी) -कलम 370 हटवल्यानंतरही काश्मिरी हिंदूंच्या स्थितीत फरक पडलेला नाही. जिहादी आतंकवादाच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने आतंकवाद संपलेला नाही. काश्मीरला आतंकवादापासून मुक्त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करावे लागेल. काश्मिरी हिंदूंना विस्थापित होण्यास उत्तरदायी कोण, हे निश्चित करून त्यांना शिक्षा ठोठावली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘काश्मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

श्री. कौल पुढे म्हणाले की, 370 कलम हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार ‘सॉफ्ट टेररिझम’ मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो. सरकारच्या या धोरणामुळे अन्यत्र छोटे काश्मीर निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरात पुनर्वसन करणे म्हणजे पूर्ण देशातून जिहादी आतंकवाद संपवण्यासारखे आहे. सरकारने 4 हजार काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये नोकरी दिली; पण त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांनी जम्मूमध्ये स्थलांतर केले आहे आणि तेथेच स्थायिक होण्याची मागणी करत आहेत. गेले 8 महिने जम्मूतील संक्रमण शिबिरांमध्ये राहत असलेले हे हिंदू विनावेतन आंदोलन करत आहेत. काश्मीरमध्ये राहत नसल्याने त्यांचे वेतन रोखून धरण्यात आले आहे. तरी जम्मूमध्ये आंदोलन करत असलेल्या हिंदू बांधवाना त्यांचे थकीत वेतन मिळावे आणि त्यांना जम्मूतच स्थायिक करावे.