मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्याची आमची खूप इच्छा होती, परंतु काँग्रेसमुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
पवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकांमुळे काँग्रेस राज यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही.
काँग्रेसला असे वाटते की, जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आघाडी केली, तर त्याचा त्यांना उत्तर भारतात फटका बसेल. कदाचित काँग्रेसला राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात फायदा होईलही, परंतु काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होतील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे.