मावळप्रमाणे कर्जत-जामखेडमधील पार्सल बारामतीला पाठवा; मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांवर निशाणा

0
704

अहमदनगर, दि. ११ (पीसीबी) – मावळच्या जनतेने हिंमत दाखवून तिथे आलेले पार्सल त्यांनी बारामतीला पाठवले. त्याप्रमाणे  कर्जत-जामखेडमध्ये आलेले पार्सलही  परत पाठवा, असे आवाहन मतदारांना  करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

कर्जत-जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,  लोकसभेच्यावेळी मावळच्या जनतेने हिंमत दाखवली आणि पार्थ पवार हे पार्सल घरी पाठवले तसेच कर्जत-जामखेडमध्ये आलेले रोहित पवार नावाचे पार्सलही तुम्ही घरी पाठवणार का? येत्या २४ तारखेला याचा फैसला होऊन जाऊ द्या.

लोकशाही आहे प्रेमाने मते मागा, धमक्या जर द्याल तर तुम्हाला उत्तर देण्याची धमकही आमच्यात आहे. तसेच आम्हाला जर निवडून दिले नाही तर आम्ही तुमचा ऊस घेणार नाही, अशी भाषा करणाऱ्याला, शेतकऱ्याला नागवणाऱ्या आणि नडणाऱ्याला गाडल्याशिवाय राहणार नाही. रामभाऊ काळजी करू नका सरकार आपले आहे, यांच्या कारखान्याने जर ऊस विकत घेतला नाही तर नवीन कारखाना उभा करा, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.