काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या २०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पिंपरीत भाजपाचे आंदोलन

0
120

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – जिथे जिथे काँग्रेसची सरकारं असतात तिथे तिथे असे नेते काँग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची, जनतेची लूट करतात. हा काँग्रेसचा गुणधर्मच आहे. याचा पुरावा आपल्याला नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मिळाला. काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला आणि मनमानी कारभाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिलं. आता झारखंड मधील या २०० कोटीच्या प्रकरणांमुळे काँग्रेस बिलकुलच सुधारली नाहीये हे दिसून येतंय, असा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केला आहे. ६ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाच्या झारखंड आणि ओडिशामधील 10 ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाने बोलंगीर कार्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बलदेव साहू कंपनीच्या सातपुडा कार्यालयावर छापा टाकून २०० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. काँग्रेसकडून सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराच्या निषेधार्त भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष शंकर जगताप बोलत होते. यावेळी, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, विशाल वाळुंजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू आणि मद्यनिर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाशी संबंधित उद्योगपती यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाची ही कारवाई सुमारे ३ दिवस बुधवारी सुंदरगढ शहरातील सरगीपाली येथील काही घरे, कार्यालये आणि डिस्टिलरीवर इथे सुरु होती. त्यातून ही रोकड विभागाने जमा केली. त्यातून इतकी जास्त रक्कम आयकर विभागाच्या हाती लागली की त्यांना मुद्दाम नोटा मोजणारी मशिन मागवून घ्यावी लागली. आणि १५७ मोठ्या बॅगांमधून ही रक्कम आयकर विभागाला न्यावी लागली. अनेक बेकायशीर व्यवसाय असलेले धीरज प्रसाद साहू काँग्रेसचे राज्यसभेचे ३ वेळचे खासदार राहिलेले आहेत. शिवाय त्यांचा दारू विक्री आणि गाळण्याचा सुद्धा व्यवसाय आहे.

राज्यसभेची खासदारकी ही राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणसाची गुणवत्ता पाहून दिली जाते. पण दारूच्या व्यवसायात असणाऱ्या आणि ज्याच्या अनेक बेकायदेशील व्यवसायांमधून अमाप संपत्ती कमावणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने राज्यसभेची खासदारी का दिलेली असेल, याचा विचार भारताच्या जनतेने करावा. परंतु काँग्रेसने कायम अशा भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घातलेलं आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्रात सुद्धा जनतेने भाजपशासित प्रशासन पाहिलं होतं, पण जनतेने दिलेला कौल धुडकावून लावून स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांचा अडीच वर्षाचा कारभार आपण पाहिला. परंतु ते अनैतिक सरकार उलथवून टाकून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे.

शंकर जगताप पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने UPA सरकार १० वर्षे राज्य करत होते. तेच काँग्रेसचे अजूनही सुरु आहे. UPA च्या अनेक भ्रष्टाचारांची उदाहरणे असल्यामुळे लाज वाटून काँग्रेसने त्यांच्या आघाडीचे नाव बदलले. काँग्रेस सरकारचा कोळसा घोटाळा, २G घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्समध्ये केलेला प्रचंड भ्रष्टाचार भारताची जनता विसरलेली नाही. इथे महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा महाराष्ट्राचा गृह मंत्री १०० कोटी हप्ते मागत फिरत होता. त्या हप्त्यांसाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत होता. हीच काँग्रेसच्या राजकारणाची पद्धत राहिलेली आहे. देशाला लुबाडणारा काँग्रेसचा ‘हात’ आहे आणि देशात विकासाची भरभराट करणारं भाजपचं कमळ आहे. देश स्वतःची वैयक्तिक ATM असल्यासारखा या काँग्रेसच्या नेत्यांनी लुटला आहे. आणि आता भारताच्या जनतेला या दोन सरकारांमधला फरक लक्षात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.