“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय नाही तर श्रद्धेचा विषय आहे”

0
180

– देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का?

पुणे, दि.०१ (पीसीबी) : औरंगाबादचं नामकरण करण्यासंबंधी सध्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे कि, ‘औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल.’ त्यामुळे नामांतरासाठी नेहमी आग्रह धरणारी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता. सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.

पाटील पुढे असंही म्हणाले कि,“ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती. चांगलं आहे, मग बाळासाहेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पुढे टीका करत ते असं म्हणाले कि, “नवीन वर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. १५ जानेवारीला १४ हजार ग्रांमपंचायत निवडणुका आहेत. त्या अधिकाधिक जिंकाव्यात यासाठी प्रयत्न आहे. याशिवाय २०२२ साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसंच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे गोळा करणं एवढंच लक्ष राहिलं आहे.”