चंद्रकांत पाटलांचा उलगडा; ‘मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे, कारण…’

0
211

पुणे, दि.०१ (पीसीबी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका असलेल्या रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचा खुलासा केला आहे. पाटील रश्मी ठाकरे यांच्याकडे सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी विचारणा करणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासंबंधीही भाष्य केलं.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, “औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता.”

सामना अग्रलेखाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असं ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही.”