ऋषभच्या खेळात शिस्त यायला हवी – विक्रम राठोड

0
634

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी-२० सामना आज चंदीगडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. धर्मशाळेच्या मैदानावरील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. ऋषभ पंतचे फलंदाजीत फॉर्मात नसणे हा गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी ऋषभला सल्ला देत, त्याच्या खेळात अधिक शिस्त येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

“ऋषभ एक चांगला खेळाडू आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र त्याला त्याच्या खेळामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याच्या खेळामध्ये अधिक शिस्त यायला हवी. आक्रमक खेळणे आणि बेजाबदार खेळणे यात फरक असतो, तो फरक सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे. संघ व्यवस्थापन ऋषभकडून कोणाताही दबाव न घेता खेळाची अपेक्षा करत आहे. त्याच्या खेळात लवकरच सुधारणा होईल अशी मला आशा आहे.” दुसऱ्या सामन्याआधी राठोड पत्रकारांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ऋषभच्या खेळाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ज्या पद्धतीने ऋषभ बेजबाबदार खेळ करतो आहे, तसा खेळ त्याने पुन्हा केला तर त्याला फटकेच मिळतील. गेल्या ९ टी-२० सामन्यांमध्ये ऋषभ पंतची फलंदाजीतली कामगिरी फारशी वाखणण्याजोगी नाहीये. विंडीज दौऱ्यात अखेरच्या टी-२० सामन्यात केलेल्या नाबाद ६५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋषभ कसा खेळ करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.