आलोक नाथ नरकात सडणार; सई ताम्हणकरचा शाप

0
4970

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. यापूर्वी ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत काही अभिनेत्रींनी व्यक्त होत बॉलिवूडमधल्या अनेक बड्या लोकांच्या सभ्य चेहऱ्यामागची कृष्णकृत्य उघड केली होती. आलोक नाथ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधल्या अनेकांना धक्का बसला आहे. त्यानंतर सिनेरसिकांनी सोशल मीडियावर अलोक नाथ यांच्याविरोधात राग व्यक्त केला आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील ट्विटरवर आपली तीव्र नाराजी दर्शवली आहे.

तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार असे ट्विट सईने करत विनता नंदा आणि मी टू मोहीमेला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सईने तनुश्री दत्तालाही पाठिंबा दर्शवला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मला धक्का बसला आहे. मात्र तिच्या आरोपात तथ्य असेल तर नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही ती म्हणाली आहे.

विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आलोक नाथ यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत. १९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये, २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचे म्हटले. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विनता नंदा यांनी त्या अभिनेत्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र, आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘संस्कारी अभिनेता’ असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांचा रोख आलोक नाथ यांच्याकडे होता हे अघड झाले.

 

मात्र आलोक नाथ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आज सगळेच तिच्यावर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तिचे आरोप मी स्वीकारत नाही मात्र ते मी नाकारतही नाही. बलात्कार घडला असेल मात्र तो मी केला नव्हता. या गोष्टीवर आता बोलणं निरर्थक आहे अशी प्रतिक्रिया अालोक नाथ यांनी दिली आहे.