आत्मनिर्भर भारतासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची – राजनाथसिंह

0
176

-डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान सोहळा
-डॉ. फिरोदिया, प्रतापराव पवार, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टरेट

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशी-2 हा त्याच योजनेचा भाग आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. आरोग्य, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी चांगली कामगिरी करत आहेत विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा, सरकार त्यांच्या पाठीशी आहे,” असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.

डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा (डीपीयू) तेरावा पदवीप्रदान समारंभ राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 20 मे) झाला. त्यानंतर ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया आणि सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांचा राजनाथसिंह यांच्या हस्ते डीपीयूच्या मानद पदवी, डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट)ने गौरव करण्यात आला. नागपुरातील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ)चे प्र-कुलपती व प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनाही यावेळी राजनाथसिंह यांनी डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

राजनाथसिंह म्हणाले की, कोरोना आपत्तीनंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर वाढला आहे. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. शरीरासोबतच मनस्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. सुख-दुःखात, लाभ-तोट्यात, विजय-पराजयात स्थितप्रज्ञ राहणे खूप महत्वाचे आहे. मनाचे संतुलन सर्वात महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, भारतात धर्माचा ऱ्हास होतो आहे. याचा अर्थ लोकांनी सतत देवळात जाऊन आरत्या कराव्यात किंवा मशिदीत जाऊन बसावे असे त्यांना अभिप्रेत नव्हते. समाज व राष्ट्राप्रती दायित्व आणि नैतिकता हा धर्म गांधीजींना अपेक्षित होता. न्याय हे इंग्लंडचे, उदारमतवाद हे फ्रान्सचे तर धर्म हे भारताचे राष्ट्र वैशिष्ट्य असल्याचे विवेकानंद सांगत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी राष्ट्राचा विचार केला पाहिजे.

पदवी घेतल्यानंतर तुम्ही देशात, जगात काम कराल तेव्हा तुमच्या मनाची व्यापकता ठरवेल की तुम्ही लोकांना काय देणार?,” असे राजनाथसिंह म्हणाले. करोडपती घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन एपीजे अब्दुल कलाम बनतो, असे सांगून राजनाथसिंह यांनी सांगितले की, अल कायदातही सुशिक्षित तरुण आहेत आणि इन्फोसिसमध्ये सुशिक्षित तरुण आहेत. तुमच्यावरचे संस्कार तुम्ही कोण होणार हे ठरवतो. कोरोना काळानंतर भारतीय वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर जगात वाढला. वैद्यकीय क्षेत्रावर कोणाची बळजोरी नव्हती पण त्यांच्यावरच्या संस्कारांमुळे त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले.

“वैद्यकीय क्षेत्रातले उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जगाची कवाडे खुली आहेत. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा मात्र देशाचा विसर पडू देऊ नका. तुमच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांना तुम्ही कदाचित ओळखतही नाही अशा देशातल्या शेतकऱ्यांपासून मजूरापर्यंतच्या लहानसहान प्रत्येक घटकाचा वाटा आहे. त्यांच्या त्याग, बलिदानाची किंमत पैसे देऊन चुकवता येणार नाही. त्यामुळे या पुढच्या आयुष्यात लोकांशी स्नेहाने वागा, त्यांचा आदर करा, त्यांची सेवा करा. आपण चांगले डॉक्टर तर बनालच पण त्यापेक्षा अधिक चांगले माणूस व्हा,” असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले.

“सन 1960 मध्ये आमचा कारखाना महाराष्ट्रात त्यावेळी हे राज्य औद्योगिक आघाडीवर नव्हते. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राची जी काही प्रगती झाली ती सरकारची देन नसून येथील लोक, उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे. सन 1931 मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी देशात सर्वाधिक होता. सन 1967 मध्ये बिहार राज्य गव्हर्नन्समध्ये देशात आघाडीवर होता. मग आता हे सगळं का बिघडले? ‘मोदी राज’मध्ये हा प्रवाह बदलला जातो आहे. आता उत्तर प्रदेशातली कायदा सुव्यवस्था सुधारत आहे. बिहारही बदलतो आहे. उद्योग, रोजगार निर्मितीत ही राज्ये सुधारतील तेव्हा महाराष्ट्राला स्पर्धा करावी लागेल. देशाच्या औद्योगिक प्रगतीचा मी साक्षीदार आहे. काही नव्हते येथे. आता ब्लॉक चेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवी तंत्रज्ञानं येत आहे. या दृष्टीने विद्यापीठांना तयार राहावे लागेल,” असे डॉ. अभय फिरोदिया म्हणाले. जैन गुरू ऋषभदेव यांनी शस्त्र संपन्नता, संवाद, कृषी, वाणिज्य हे कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते. आपला देश त्या दिशेने वाटचाल करू लागला असल्याचे फिरोदिया म्हणाले.

शिक्षण व्यवस्था केवळ पुस्तकी न राहता कल्पक झाली पाहिजे, असे प्रतापराव पवार म्हणाले. त्यांनी सांगितले, “शैक्षणिक संस्थांनी उद्योग-व्यवसायांशी संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण वाढवली पाहिजे. विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थी दशेतच त्यांना उद्योग-व्यवसायांचा अनुभव मिळाला पाहिजे. पुढच्या दहा वर्षात सॉफ्टवेअर व्यवसाय पन्नास अब्ज डॉलर्सवर जाणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यात भारताची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ” भारताला सध्या चांगले नेतृत्त्व लाभले आहे. स्थिर सरकार आहे. त्यामुळे सुपर पॉवर बनण्याची संधी भारतापुढे आहे. या दृष्टीने शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातली देवाणघेवाण वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, या देशाचे भवितव्य शाळा-महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आहे. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात त्याप्रमाणे एकविसावे शतक भारताचे असणार आहे. कारण हा देश जगात सर्वाधित तरुण आणि सुशिक्षित मनुष्यबळ असणारा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जगातले सर्वात मोठे कुशल मनुष्यबळ भारताकडे आहे.भारतीय वैद्यकीय शिक्षण जगात सर्वोत्तम आहे. अमेरिकी वैद्यकीय विद्यार्थी चार वर्षात 15 ते 20 हजार रुग्ण तपासतात. भारतीय विद्यार्थी त्याच्या चौपट विद्यार्थी तपासतात. या पार्श्वभूमीवर गुणवत्तेच्या जोरावर एकविसाव्या शतकातील वैद्यकीय क्षेत्र भारत काबीज करेल.

कुलपती पी. डी. पाटील यांनी दीपप्रज्वलन केले आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (डीपीयू) कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले, “विद्यापीठाला ए प्लस प्लस ग्रेड मिळाली आहे. दंत आरोग्य गटात ‘डीपीयू’ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय गटात ‘डीपीयू’ देशात 19 व्या तर विद्यापीठ गटात देशात 49 व्या स्थानावर आहे.” राजनाथसिंह यांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या २६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील २१९१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यात १२ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), १४१६ पदव्युत्तर पदवी, ७५४ पदवी व ९ पदविका या अशा एकूण दहा विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.