आता १५ ऑगस्टपासून रास्ता रोको नाही; अन्नत्याग आंदोलन करणार

0
1263

पुणे, दि. १० (पीसीबी) – ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचे  मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

आम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.

आंदोलनावेळी जो हिंसाचार घडला त्याचा आम्ही निषेध करतो. आता यापुढे रस्त्यावर न उतरता तालुका व जिल्हास्तरावर चक्री उपोषण केले जाईल. त्याचबरोबर आत्मक्लेश म्हणून १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शांतता बाळगण्याचे आवाहन करत होतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याकडून जे नुकसान झाले त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो व त्याची भरपाई करून देऊ, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.

 

ज्यांनी तोडफोड केली ते मराठा आंदोलक नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अशांवर कारवाई करावी. पण ज्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. अशांवर गुन्हे दाखल केले जाऊ नयेत. आम्ही याबाबत पोलिसांशीही चर्चा केली. त्यांनीही जे निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ असे आम्हाला आश्वस्त केले असले तरी प्रत्यक्षात कृती केले नसल्याचे ते म्हणाले.