आता तरी तोंडाला चिकटपट्टी लावा – वडेट्टीवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

0
274

नागपूर, दि. ११ (पीसीबी) : काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मिलाखतीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाविकासआघाडी सरकार पडणार आहे, जाणार आहे अशा वावड्या उठवणाऱ्यांवर या मुलाखतीनंतर तोंडाला चिकटपट्ट्या लावण्याची वेळ आली आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच आघाडीतील मतभेद आणि सरकार कोसळणार अशा चर्चांना प्रत्युत्तर दिलं.

विजय वडेट्टीवार, “शरद पवार यांच्या मुलाखतीतून महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार पडणार, जाणार अशा वावड्या उठवणाऱ्यांनी आता तोंडाला चिकटपट्टी लावण्याची वेळ आली. वावड्या उठवणाऱ्यांना शरद पवार यांच्या मुलाखतीतून सरकार जाणार नाही, त्यांना विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा हा स्पष्ट संदेश मिळाला आहे.”

“जेव्हा तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होतं तेव्हा ते अपघाताने होत नाही, तर विचारपूर्वक होतं. ज्याचा त्याचा स्वतःचा अजेंडा असतो, स्वतंत्र विचार असतो, विचारधारा असते. हे सर्व पाहता अशा गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतात. त्याचे परिणाम चांगले आणि वाईट होत असतात. कोणताही पक्ष आपल्या पक्षाचं नुकसान होईल असा निर्णय घेत नाही. त्यामुळेच तो निर्णय घेतला गेला,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आघाडी सरकार भक्कमपणे येणाऱ्या संकटाचा सामना करत महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी काम करत आहे. लोकांना गृहित धरुन चालत नाही. कुणाचे चांगले तर कुणाचे वाईट दिवस असतात. मात्र, लोकांना गृहित धरलं तर आज महाराष्ट्रात जे दिसतंय तेच दिसेल,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.