अर्थसंकल्पावरील उत्तरादरम्यान अर्थमंत्र्यांनी दिशाभूल करणारी उत्तरं दिली – देवेंद्र फडणवीस

0
377
मुंबई, दि.१३ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून शुक्रवारी सभागृहात अर्थसंकल्पावरील उत्तरादरम्यान अर्थमंत्र्यांनी दिशाभूल करणारी उत्तरं दिल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी केवळ भाषणबाजी केली आहे. अर्थसंकल्पावर त्यांचं दिशाभूल करणारं उत्तर होतं. राज्यावरील कर्ज, राजकोषीय तूट, महसुली तुटीबाबत कुठलाही उल्लेख यामध्ये करण्यात आला नाही. आजवरचा हा पहिला असा अर्थसंकल्प असेल ज्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सचा उल्लेख नाही. मराठवाड्यासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात काहीही देण्यात आलेलं नाही. पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योजनांबाबतही यात उल्लेख केलेला नाही. आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेसाठी सरकारनं एक नवा पैसाही दिलेला नाही. याबाबत आम्ही मुद्दा उपस्थितत केला मात्र त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी दिलं नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना, बेरोजगारांना काहीही मिळालेलं नाही. अनेक जिल्यांमधील योजना कमी करण्यात आल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील योजनांसाठी कमी पैसा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या योजनांचाही निधी कापण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमधील निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील योजनांबाबत आपल्या उत्तरात अर्थमंत्री एक अवाक्षराही बोललेले नाहीत, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.