अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत दाखल; भाजप प्रवेशाची चर्चा  

0
815

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – काँग्रेसविरोधात बंडखोरी करून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार  आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  एकाच विमानातून मुंबईपर्यंत प्रवास केला. यामुळे सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   

बुधवारी रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात  सत्तार आणि  दानवे यांच्या दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली.  त्यानंतर ते दोघे एकाच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे सत्तार   भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अब्दुल सत्तार हे काँग्रेसकडून औरंगाबादमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना  डावलून सुभाष झांबड यांना उमेदवारी  दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष लढण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.