“अनिल देशमुखांनी कुणालाही वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये; त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावं”

0
236

नागपूर, दि.९ (पीसीबी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांची पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केलाय.अनिल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले.

कलेक्शन झालं पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे त्यांनी सांगावं. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचं माहिती होतं. तेव्हा कारवाई का केली नाही? आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय. न्यायालयाने राजकीय गुन्हेगारी केसेसचा निकाल लावावा, असंही आंबेडकर म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना पुन्हा ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांचा अटकपर्व जामीन फेटाळण्यात आलाय.