“अजित पवारांचा पापडही भाजता आला नाही; शेठ काय हे!”

0
453

महाराष्ट्र, दि.४ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय, तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आणि अखेर नव्याने उद्यास आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला. याच ‘ऑफर’च्या संदर्भाने शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला देत शिवसेनेने भाजपाला चिमटे काढले आहेत.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राज्यात सत्तास्थापनेच्या काळात झालेल्या घडामोडींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना खडेबोल सुनावले आहेत. “निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की , ‘ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी – शहा यांना साडेपाच वर्षे का लागावीत? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला वजा इशारा शिवसेनेने भाजपाला दिला आहे.