अखेर मंत्री संजय राठोड १५ दिवसांनी सर्वांसमोर

0
220

वाशीम,दि.२३(पीसीबी) – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी समोर आले आहेत. पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीसाठी रवाना झाले आहेत.

संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे.