पहाटेच्या शपथविधीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले – शरद पवार

0
336

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – पहाटे सरकार बनविण्याचा प्रयत्नाचा एकचा फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली. असे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? राष्ट्रपती राजवट उठल्यानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मी जे सांगितले ते समजणा-यांना समजते असे सूचक विधानही त्यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेसौदागर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले उपस्थित होते.

सहसा मी पोटनिवडणुकीतील प्रचाराला जात नसतो. पण, एकेकाळी मला देशाच्या संसदेत पाठविण्यास या मतदारसंघाने हातभार लावला आहे. महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. सहज चक्कर ठाकण्यासाठी मी आलो आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असलो. तरी, मी या जिल्ह्यातील आहे. येथून चारवेळा निवडून गेलो. लोकांशी माझे संबंध आहेत. भेटीगाठी होतात. यासाठी मी आलो आहे, असेही ते म्हणाले.