चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना …

0
224

मुंबई, दि. २० (पीसीबी)  : चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना … हे गीत सध्या सोशाल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारं गाणं,उद्धव ठाकरे यांच्या वेदना धारदार शब्दात मांडणारं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यातील जनतेत सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याच भावना रत्नागिरीतील युवा कवीने शब्दातून उतरवल्या आहेत. शिवसेनेच्या सद्यस्थितीवरील कविता सादर करतानाचा व्हिडिओ या तरुण कवीने सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता तो तुफान व्हायरल झालाय. एवढ्या सटीक भाष्य करणारा हा कवी कोण आहे, यावरून शोधाशोध सुरु आहे.

शिवसेनेच्या वेदनांवर भाष्य
लांजा येथील युवा कवी,लेखक विकास लांबोरे यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.  चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना, असे हे गीत आहे. सुप्रीम कोर्ट तुम्हा विनंती, ऐकाव्या वेदाना.. संविधानाच्या कलमामधला आयोग लावतोय चुना.. असे या गीताचे बोल आहेत.  आयोगाच्या निकालानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना म्हणत विकास लांबोरे यांनी हे गीत गायले आहे.

व्हायरल झालेली कविता कोणती?
सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना
संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना
चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना?

मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण
सत्तेचा हा माज कशाला.. विचारी जनता जनार्दन
सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकुमशाही
म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही
सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

कोण आहेत विकास लांबोरे?
विकास लांबोरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील मूळ रहिवासी आहेत. सध्या मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. उत्तम कवी, लेखक, गायक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हातभेटीची ओटी, वस्तीची एस्‌‍टी हे लघुपट लिहिले आहेत. ‘थेट खळ्यातून’ या चारोळी व ‘भोंबडातला डोंगळा’ हा काव्य संग्रही प्रसिध्द झाला आहे. हरवलेलं महोरपण, पावनं जाऊ नका जेवल्याशिवाय, करतो इदवास भगत बुवा, अशी त्यांनी लिहिलेली गाणीही लोकप्रिय आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारी ‘चोरली कुणी शिवसेना’ हे गीतही सध्या चांगले लोकप्रिय व व्हायरल होत आहे.