नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण यांना सात महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही

0
165

वसमत, दि. ११ (पीसीबी) : विरोधकांवर टीका, टिप्पणी करण्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची एक वेगळीच शैली आहे. त्यांच्या भाषणातील टोलेबाजीचे अनेकजण चाहते आहेत. राज्यातील रखडेलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर अशीच त्यांनी केलेली टोलेबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. वसमत येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण यांना सात महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार काही करता आला नाही, असा चिमटा पवारांनी काढला. शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का ? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थितीत केला. राज्यातील सत्तांतरानंतर सरकार स्थापन होवून सात महिने झाले तरी मंत्रीमंडळ विस्ताराला काही मुहूर्त लागेना. मंत्रीमंडळात स्थान मिळेल म्हणून आशेवर असलेल्या शिंदे व फडणवीस गटातील आमदारांना अजित पवार त्यांनी शिवून ठेवलेल्या कोट, ज्योतपुरीवरूनही टोले लगावल्याने त्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.

आता पुन्हा त्यांनी सरकारच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर टोलेबाजी केली. या शिवाय राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, याचा उल्लेख करत सरकारला सुनावले. अजित पवार म्हणाले, महिलांना मंत्रिमंडळ स्थान देऊन असं फक्त मुख्यमंत्री म्हणतात, पण कधी देणार? सरकारला सत्ते येऊन सात महिने झाले, मात्र अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येत यांना मात्र साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त टिपोजीराव असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.