मुंबई, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (रविवार) पार पडली. मतदानानंतर वेगवेगळ्या संस्थांचा एक्झिट पोल प्रसिध्द झाला आहे. एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलनुसार युतीला राज्यात ३४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला १४ जागा मिळतील. युतीला ७ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे गुरूवारी (दि.२३) स्पष्ट होईल. मात्र एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना १७, भाजप-१७, काँग्रेस-४, राष्ट्रवादी- ९ आणि स्वाभिमानीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उतरून चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत खातेही खोलता येणार नसल्याचे एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलमधून समोर येत आहे.
लोकसभेच्या निवडणूक २०१४ शी एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलची तुलना केली, तर भाजपला ६ जागांचा तर शिवसेनेला १ जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादीच्या ५ जागा वाढण्याची शक्यता आहे.
एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलच्या आकडेवारी
शिवसेना -१७
भाजप -१७
काँग्रेस -४
राष्ट्रवादी – ९
स्वाभिमानी शेतकरी संघटना -१
लोकसभा निवडणूक २०१४ निकाल
शिवसेना – १८
भाजप – २३
काँग्रेस – २
राष्ट्रवादी -४
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १