कोल्हापूर, दि. २० (पीसीबी) – मुंबईत भाजपचे शिवसेनेपेक्षा केवळ दोन नगरसेवक कमी आहेत. त्यामुळे तेथे आमचा महापौर करणे काहीच अवघड नव्हते; परंतु केवळ युती टिकण्यासाठी व काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आम्ही सबुरीने घेतले आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात नदीवरील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा काँग्रेसला केवळ सत्तेसाठी हवा आहे. अनेक निवडणुकांमध्ये अत्यल्प यश मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.
आम्ही कामे कमी आणि घोषणा जास्त करतो, अशी रोजची टीका आमच्यावर शिवसेनेच्या सामनातून होत आहे. शिवसेनेचे आमदार ज्या विकासकामांची उद्घाटने करत आहेत, ती वस्तुस्थिती पक्षप्रमुखांना बहुतेक सांगत नसावेत, असा चिमटा पाटील यांनी यावेळी काढला.