ओव्हाळ हे साहित्य परिषदेत मिळालेल्या संधीचे सोनं करतील- डॉ श्रीपाल सबनीस
दि.२९(पीसीबी)-महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 120 वर्षाच्या इतिहासात उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले प्रभाकर ओव्हाळ हे मिळालेल्या संधीचे सोनं करतील, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केला.
सोहम सार्वजनिक ग्रंथालय, अंशुल प्रकाशन व जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदी निवडून आल्याबद्दल जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ व कविवर्य राजन लाखे यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत तुकाराम नगर येथील सोहम ग्रंथालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर रवी लांडगे, गझलकार व साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संयोजक जगन्नाथ नेरकर, ॲड लक्ष्मण रानवडे, पत्रकार व लेखक विजय जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
“आपल्या लेखणीतून उपेक्षित समाजातील वेदनांना न्याय मिळवून देण्याचे श्री ओव्हाळ यांनी आयुष्यभर काम केले, ते समरसतेची गुढी उभारतील” असा विश्वास डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. महापौर रवी लांडगे यांनी आपल्या भाषणात, नवनिर्वाचित दोन्ही सदस्य शहराचे भूषण व अभिमान असून साहित्य परिषदेच्या उपक्रमांना महापालिका सदैव पाठीशी असेल, असे म्हटले. यावेळी निफाडकर, मानव कांबळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले तर विष्णू मांजरे यांनी आभार मानले.









































