पावसाचा जोर वाढला; वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्ट्या

0
8

दि . १९ ( पीसीबी ) – आळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान होईल. मात्र, काल रात्रीपासून शहरात पावसाचा जोर वाढला आहे. जाधववाडी ल पा तलाव ९४ टक्के भरल्यामुळे हा तलावर ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं इंद्रायणी नदीत विसर्ग सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळं इंद्रयणी काळी असलेल्या मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जाधववाडी ल.पा. तलाव ९४.५३ टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. द्वारविरहित असलेला हा तलाव १०० टक्के भरल्यास अनियंत्रित पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाने दिली आहे.

 देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

काल संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून पंढरीकडे झाले असून, आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. पण रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वारकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, पावासाचा जोर पाहता सर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

 हवामान विभागाच्या  माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यामध्ये पुढील तीन ते चार तास दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  पुढील २४ तास महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर मुंबई, ठाणे, पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असेदेखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 

शाळांना सुट्ट्या

हवामान खात्याच्या अतीवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शाला कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात  आल्या आहेत.