पूल कोसळतानाचा फोटो व्हायरल

0
7

दि . १६ ( पीसीबी ) – कुंडमळा (इंदोरी) येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल (साकव) कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेचा कोसळतानाचा थरकाप उडवणारा फोटो आता समोर आला आहे. पावसात ओथंबलेल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा क्षणात जीवन फिसकटल्याचा हा चित्रफीत स्वरूपातील दु:खद दस्तऐवज ठरतो आहे.

१५ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत एक लहान मुलासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सध्या विविध रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सामान्यतः पर्यटकांना आवडणारा हा पूल आजूबाजूच्या गावांना जोडणारा जुना, अंदाजे ३० वर्षांपूर्वीचा लोखंडी साकव होता. स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे १०० ते १२५ पर्यटक पुलावर उपस्थित होते. पावसामुळे नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असतानाही काही पर्यटक पूल ओलांडत होते. त्याचवेळी पूल अचानक कोसळला.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रकांत साठले, रोहित माने, विहान माने आणि एका अज्ञात पुरुषाचा समावेश* आहे.
जखमींमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर पवना, मायमर, अथर्व आणि युनिक हॉस्पिटल्स येथे उपचार सुरू आहेत.

पूल कोसळतानाचा फोटो एका पर्यटक युवकाने घेतलेला असल्याची माहिती आहे. यात पूल एकीकडे झुकताना आणि लोक घाबरून मागे हटताना दिसत आहेत. काही क्षणांत पूल कोसळतो आणि अनेकजण त्यात पडतात, असा दृश्य क्रम या फोटोत स्पष्ट जाणवतो. हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

दुर्घटनेनंतर NDRF, CRPF, पिंपरी चिंचवड पोलिस, PMRDA अग्निशमन विभाग आणि वन्यजीव संघटना* घटनास्थळी दाखल होऊन *बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले. अडकलेल्यांना क्रेन, दोरखंड आणि बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पूल धोकादायक स्थितीत असूनही त्याची डागडुजी किंवा नवीन पूल उभारणी का झाली नाही*, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राजकीय आणि सामाजिक पातळीवरही प्रशासनाच्या कामकाजावर टीका होत आहे.

सध्या पूलाचे अवशेष क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असून, जिल्हा प्रशासनाने घटनेचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. *राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

ही दुर्घटना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाची आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीच्या दुर्लक्षाची जिवंत साक्ष आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.