सातारा, दि. १९ (पीसीबी) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. आता मी सातारा जिल्ह्यावर लक्ष दिले आहे. त्यामुळे साताऱ्याचा बालेकिल्ला तोडण्यासाठी मी आलो आहे, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.
सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्ह्यातील बालेकिल्ला तोडण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवस तळ ठोकणार आहे. राज्यात भाजप घटक पक्षांचे सरकार आल्यानंतर ग्रामिण भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. दुष्काळी भागातील अपूर्ण पाणी योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून १४ हजार कोटींचा निधी आणला आहे. एका वर्षांत हजार कोटींचे हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत.
या रस्त्यावर पुढील दहा वर्षात एकही खड्डा नसेल, मग खड्डेच दिसणार नसल्याने खासदार सुप्रिया ताई सेल्फी कशा बरोबर काढणार? असा खोचक सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.