राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे…???

0
357

पुणे, दि. १५ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता. पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील’, असं विधान पत्रकारांशी बोलताना केलं आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येतेय.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाकुणीची निवड केली, याबाबत माहिती देताना अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची विधानं केली आहे. बँका चालवणं हे तसं स्पर्धात्मक झालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. यानंतर अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सवाल करण्यात आला. राज्यातील निर्बंध आणखी वाढवले जाणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की…
नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.

अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत. मात्र त्यांचा उल्लेख चक्क मुख्यमंत्री म्हणून केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क काढला जातो आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे फारसे माध्यमांसमोर आलेले नाहीत. एका ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील भार हलका केला असल्याचंही विधान केलं होतं. अशातच आता अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांच्याऐवजी आदित्य यांचं नाव घेतल्यानं चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल!