नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी आयपीएल गाजवले. आयपीएलमधील सर्वाधिक धावांसह ऑरेंज कॅपही ऋतुराजने यावेळी पटकावली. त्यानंतर आता ऋतुराजकडे कर्णधारपदही देण्यात आले आहे.
ऋतुराजने यावेळी आयपीएलमध्ये सर्वांचा विश्वास जिंकत देदिप्यमान कामगिरी केली आणि याचेच फळ आता त्याला मिळाले आहे. कारण महाराष्ट्राच्या संघाने आता ऋतुराजकडे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयची ४ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत ऋतुराज महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. ऋतुराज या संघाचे नेतृत्व कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष राहील. कारण जर यावेळी एक कर्णधार म्हणून ऋतुराजकडून चांगली कामगिरी झाली तर त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करायला मिळू शकते. कारण सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. कारण धोनी आता पुढच्या वर्षी खेळेल की नाही, याबाबत शंका आहे. कारण चेन्नईला जेतेपद मिळवून दिल्यावर धोनी आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर संघातील बरेच खेळाडू चेन्नईची साथ सोडतील. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी धोनीनंतर ऋतुराजच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आता सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत ऋतुराज कसे नेतृत्व करतो आणि त्याला किती यश मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पुढच्यावर्षी आयपीएलमध्ये मोठा लिलाव होणार आहे. पण चेन्नईचा संघ काही खेळाडूंना रिटेन करू शकतो, यामध्ये ऋतुराजचे नाव असू शकते. कारण जेतेपदानंतर धोनीने सांगितले होते की, आता चेन्नईला पुढच्या १० वर्षांचा विचार करून संघबांधणी करावी लागेल. त्यामुळे पुढच्या १० वर्षांचा विचार केला तर चेन्नईला ऋतुराजसारख्या संघात स्थिरस्थावर झालेल्या खेळाडूची नक्कीच गरज असेल.