लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि.२३(पीसीबी)-लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरुन पडून झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रथमदर्शनी अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपल्या मित्राच्या साथीने हा खुनाचा कट रचला आणि लोहगडाच्या दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सियाने हा कट का रचला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

व्यावसायिक कुटुंबातील हा विवाह सोहळा

मृत केतन अग्रवाल हा शहरातील नामवंत व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा पुत्र होता. त्यांचे लग्न मार्केट यार्डातील ज्येष्ठ मसाल्यांचे व्यापारी गोयल कुटुंबातील सिया गोयलशी निश्चित झाला होता. दोन्ही मोठ्या व्यावसायिक परिवारांमधील या लग्नाचा कार्यक्रम जयपूरमध्ये अत्यंत भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी दोन विमानांची बुकिंगही करण्यात आली होती.

हत्येमागचे कारण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयलला केतन अग्रवालशी लग्न करायचे नव्हते. या विवाहाला विरोध असल्याने तिने आपल्या एका मित्राच्या मदतीने हा भयानक कट आखला. कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन जाण्यात आले. तेथे योग्य वेळ साधून सिया आणि तिच्या मित्राने त्याला खोल दरीत ढकलून दिले. या घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचे समजले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या हायप्रोफाइल खुनाच्या प्रकरणाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Share This Article