मुंबई, दि. १९ – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत फुटल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ‘तुतारीचे ५ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात’, असा खळबळजनक दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः शरद पवारांच्या पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
आम्ही अशा प्रकारचं ऑपरेशन घड्याळ वैगेरे करणार नाही. पण खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत. आम्ही अशा प्रकारचं कोणतं ऑपरेशन राबवणार नाहीत. त्यांचं ऑपरेशन ते तुतारीवाले स्वत:च करतील. माझा असा अंदाज आहे की, तुतारीचे कमीत कमी ५ खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
