निरोगी जीवनशैलीसाठी ‘ब्रेकफास्ट अँड टी विथ सीमा सावळे’ या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि.०५(पीसीबी)-पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळच्या वातावरणात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जेष्ठ नागरिक संघ, सकाळी चालायला येणारे नागरिक, नियमित योगाभ्यास करणारे योगप्रेमी तसेच ओपन जिमचा वापर करणारे फिटनेस प्रेमी यांचं कौतुक करण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेविका सीमा ताई सावळे यांनी ‘ब्रेकफास्ट अँड टी विथ सीमा सावळे’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपले अनुभव, व्यायामाचे फायदे आणि दैनंदिन दिनचर्येतील शारीरिक हालचालींचे महत्त्व याबाबत मत मांडले.

सीमा ताई सावळे यांची फिटनेसच्या माध्यमातून समाजजागृती

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांची जाणीव ठेवून अनेक उपक्रम राबवणाऱ्या सीमा ताई सावळे यांनी या कार्यक्रमातून एक स्पष्ट संदेश दिला ‘शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती’ त्यांनी नागरिकांना रोज किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करण्याचे, चालण्याची सवय लावण्याचे आणि निरोगी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन केले.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक समाजातून होत आहे. फिटनेस, योग आणि नियमित व्यायामाद्वारे नागरिक निरोगी राहावेत, उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळावे, यासाठी त्या विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहेत. निरोगी जीवनशैलीचा अंगीकार केल्यास तणाव, हृदयरोग, स्थूलपणा आणि अनेक आजारांपासून बचाव होतो, तसेच मानसिक आरोग्यही मजबूत राहते हे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळी चालणारे नागरिक, योग करणारे गट आणि ओपन जिम प्रेमी बागांमध्ये सातत्याने व्यायाम करत असल्याचे पाहून त्यांच्या आरोग्यनिष्ठेचे विशेष कौतुक करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत व्यायाम ही केवळ सवय नसून जगण्याची आवश्यकता बनली असून त्यासाठी नागरिक सातत्याने प्रयत्न करत आहेत, याचा आनंद व्यक्त करत सीमा ताईंनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात सगळ्यांसोबत चहा–नाश्ता घेत आनंदी वातावरणात संवाद साधण्यात आला.सीमा सावळे समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कायम पुढाकार घेतात. त्यांच्या या उपक्रमामुळे फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये आरोग्याची जाणीव वाढावी आणि सर्वांनी नियमित व्यायाम करून निरोगी राहावे, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे पोहोचला असून समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.

Share This Article