हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले – माजी मंत्री सदाभाऊ खोत

0
236

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेलं आहे. या सरकारलाच कोरोना झाला असून सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत. यांना शेतकऱ्यांचे देणं-घेणं नसल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडी सरकारवर टीका केलीय.

हे सरकार आम्हाला लुटणारचं असेल तर आम्हीच आमचं दूध फुकट द्यायला तयार आहोत. तुम्ही घेऊन जावा. यातून सराकार जागं झालं तर ठिक, नाही जागं झालं तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल. कारण. शेतकऱ्यांसमोर आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवरती झोपलेले आहे. या सरकारलाच कोरोना झालाय. तर सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झाले असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.
सदाभाऊ पुढे म्हणले, की आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे देणं-घेणं नाही. कोकणातील शेतकरी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. राज्यात सोयाबीनचा जो पेरा झाला. त्यात खराब बियाणं शेतकऱ्यांना देण्यात आलं. यात 60 टक्के बियाणं उगवलं नाही. त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी विक्री व्यवस्था या सरकारने उभी करायला पाहिजे होती. पण, तशा प्रकारची कोणतीही व्यवस्था सरकारकडून करण्यात आली नाही. साडेबाराशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार मुकं आणि बहिरं झालं आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांची काळजी नाही. मी मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला.