कोलकाता, दि. २२ (पीसीबी) – साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले असून न्यायालयात त्यांच्यावरील खटला खोटा असल्याचे सिध्द झाले आहे, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट करून साध्वी प्रज्ञासिंग यांची पाठराखण केली आहे.
कोलकाता येथे आज (सोमवार) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहा बोलत होते.
शहा म्हणाले की, स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते, त्यांना का सोडण्यात आले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
बंगालच्या जनतेने तृणमुलच्या दडपशाहीला झुगारून देण्याची वेळ आली आहे. वोट बँकेच्या माध्यमातून बंगालीच संस्कृती दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बंगालमध्ये पोलीस आणि बाबूशाहीच राज्य चालवत आहे, असा आरोप अमित शहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.